मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थापलेल्या टास्क फोर्स मोहिमेअंतर्गत येथील ‘प्लास्टिक बॅग मॅन्युफक्चर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ने (पीबीएमएआय) मुंबई, कल्याण-डोंबिवली, पुणे, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, लातूर आणि नागपूर अशा शहरांतील गर्दीच्या ठिकाणी ९० दिवसांची स्वच्छता शिबिरे सुरू करण्यात आली आहेत.
‘पीबीएमएआय’चे मुख्य समन्वयक सौनिल शहा म्हणाले, ‘गर्दीच्या ठिकाणी प्लास्टिक कचरा जमा करण्यासाठी ‘पीबीएमएआय’तर्फे माणसे उभी करण्यात आली आहेत. मुंबईमध्ये चौपाटी आणि जुहू किनारा, सीएसटीएम आणि मुंबई सेंट्रल रेल्वेस्थानक व एसटी बस डेपो, हाजी अली, मुंबादेवी, महालक्ष्मी आणि सिद्धीविनायक याठिकाणी ही सोय ठेवण्यात आली आहेत. रस्त्यावरून मार्गस्थ होणाऱ्या प्रत्येकाला प्लास्टिक पिशव्या, कंटेनर्स, मल्टीलेयर्स आणि ‘एफएमसीजी’ उत्पादनांची लॅमिनेटेड पॅक, पेट बॉटल्स विशेषपणे मार्क केलेल्या प्लास्टिक पुनर्चक्र (रिसायकल-प्लास्टिक) डब्यात टाकण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ‘पीबीएमएआय’चे स्वयंसेवक या परिसरातील सर्व प्लास्टिक कचरा जमा करण्याची जबाबदारी सांभाळत असून, कचरा पुनर्वापरासाठी जमा करत आहेत.’
या मोहिमेअंतर्गत आजवर ‘बीएमसी’ने १२० टन प्लास्टिक जमा केला आहे. ‘पीबीएमएआय’च्या या प्रयत्नात पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उपनगरांमधील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये स्वयंसेवकांसोबत सहभागी करून घेतले जात आहे. याबाबत अधिक माहिती देताना शहा म्हणाले, ‘ठरवलेल्या जागा त्वरीत प्लास्टिकमुक्त करून ‘पीबीएमएआय’तर्फे रहिवाशांना ५० मायक्रॉन खालील निषिद्ध प्लास्टिक देऊन टाकण्याचे आवाहन करण्यात येते. ज्यामुळे हे प्लास्टिक पुनर्वापरासाठी उपयोगी ठरेल. ‘पीबीएमएआय’चे स्वयंसेवक हाउसिंग सोसायट्यांमध्ये जाऊन मदत करत आहेत. हे प्लास्टिक जमा करून ते थेट प्लास्टिक कचरा पुनर्वापरकर्त्यांना विकण्यात येते किंवा मग ‘बीएमसी’ची गाडी येऊन ते जमा करून घेते. मुंबईच्या उपनगरांमधील रहिवाशांना बीएमसीच्या प्लास्टिक वेस्ट हेल्पलाइनवर सर्वप्रकारचे मार्गदर्शन उपलब्ध आहे.’
‘याशिवाय ‘पीबीएमएआय’तर्फे प्लास्टिक पुनर्चक्र महाराष्ट्रातील मुख्य शहरांमध्ये चालविण्यात येते. आम्ही इतर शहरी स्थानिक संस्थांना ही प्लास्टिक कचऱ्यासाठी हेल्पलाइन स्थापन करण्याची विनंती करत आहोत. सुट्ट्या आणि लग्नांचा हंगाम असल्याने रेल्वे स्थानके, बस आगारे, बाजार, देवळांमध्ये आणि इतर सार्वजनिक ठिकाणी बरीच गर्दी होताना दिसते. त्यामुळे ‘पीबीएमएआय’ स्वयंसेवकांना मार्गस्थ होणाऱ्या व्यक्तीसोबत वैयक्तिक संवाद साधण्याची मोठी संधी मिळते. ज्यांना प्लास्टिकच्या जबाबदार वापराविषयी १२० सेकंदांचे प्रेझेंटेशन जाणून घेण्याची इच्छा आहे, त्यांना त्याविषयी समजवून सांगण्यात येते. इतरांना लिफलेट्स, पोस्टर्स आणि बॅनर्स, लाउडस्पिकरवरून संदेश देऊन सजग करण्यात येत आहे,’ असे शहा म्हणाले.
‘पीबीएमएआय’चे सहसचिव निमित पुनामिया म्हणाले, ‘प्लास्टिकचा वापर जबाबदारीने केला, तर ते मनुष्यासाठी एक वरदान आहे. प्लास्टिकला पर्याय उपलब्ध नसताना त्यावर बंदी घालणे फारच अवघड आहे. नागरिक आणि वेस्ट कलेक्शन एजन्सी यांनी एकजूट दाखवणे आवश्यक आहे. आम्ही काही जागा निवडून लवकरच तो भाग ही प्लास्टिकमुक्त करणार आहोत. महाराष्ट्र शासन ‘एक्सटेंडेट प्रोड्युसर्स रिस्पॉन्सीबीलिटी’ (ईपीआर) योजनेचा विस्तार करते आहे. महाराष्ट्राला पहिले प्लास्टिकमुक्त राज्य बनविण्यासाठी सर्व प्लास्टिक पिशव्या निर्मितीदारांनी सगळ्या उपक्रमांसाठी बिनशर्त स्वाक्षरी द्यायची आहे.’
मुंबई उपनगरांमधील रहिवाशांसाठी हेल्पलाइन क्रमांक : १८० २२२ ३५७